भाजपाला गुजरातमधली लढाई का झाली अवघड?

आज लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. या तिसर्‍या टप्प्यात गुजरातमधील उर्वरित २५ लोकसभा आणि पाच विधानसभा मतदारसंघातील २६६ उमेदवारांचे भवितव्य गुजरातमधील जनता ठरवणार आहेत. आज गुजरातचे ४.९ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदान करणाऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचादेखील समावेश आहे. दोघांनीही गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून मतदानाचा हक्क बजावला आहे. २०१४ आणि २०१९ मधील निवडणुकांच्या तुलनेत गुजरातमध्ये यंदा भाजपासमोर अनेक आव्हाने आहेत.

सूरत मतदारसंघात आधीच भाजपा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. खोट्या स्वाक्षर्‍यांमुळे निवडणूक आयोगाने काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी यांचे नामांकन रद्द केल्यामुळे आणि उर्वरित उमेदवारांनीही नामांकन रद्द केल्याने सूरत लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे, भाजपासमोर क्षत्रियांचे सर्वात मोठे आव्हान आहे.

हेही वाचा : मुंबईची धुरा अमराठी नेत्यांच्या हाती; पहिल्या निवडणुकीपासूनचे निकाल काय सांगतात?

भाजपावर बहिष्कार टाकण्याची धमकी

गुजरातच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास ६.५ टक्के लोकसंख्या क्षत्रियांची आहे. २२ मार्च रोजी भाजपाचे राजकोट येथील उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी क्षत्रिय समुदायाबद्दल केलेल्या एका वक्तव्याने गुजरातमधील संपूर्ण क्षत्रिय समाज संतापला आहे. क्षत्रिय समुदायाने रूपाला आणि भाजपाविरोधात राज्यभर निदर्शने केली आहेत. क्षत्रिय समुदाय इतका तापला आहे की, त्यांनी भाजपाच्या प्रचारसभांमध्येदेखील व्यत्यय आणला आणि भाजपावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली.

भाजपाने हे प्रकरण शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. या प्रकरणानंतर भाजपाने रूपाला यांच्या प्रचारासाठी कर्नाटकचे माजी राज्यपाल वजुभाई वाला, माजी केंद्रीय मंत्री वल्लभ कथिरिया आणि माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांसारख्या दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले. रूपाला हे कडवा पाटीदार समजातील आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे उमेदवार परेश धनानी लेउवा पाटीदार आहेत. २२ वर्षांपूर्वी अमरेली विधानसभा निवडणुकीत परेश धनानी यांनी रूपालांचा पराभव केला होता, त्यामुळे काँग्रेसने त्यांना मैदानात उतरवले आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना अशी भीती आहे की, जर क्षत्रियांनी आपला राग मतदानावर काढला, तर भाजपा किमान पाच जागांवर आघाडी गमावेल.

पक्षांतर्गत विरोधामुळे उमेदवार बदलले

पक्षांतर्गत विरोधामुळे उमेदवार बदलल्यानेदेखील भाजपाच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विक्रमी कामगिरी करून डिसेंबर २०२२ मध्ये राज्यात सत्तेवर परतलेल्या भाजपाने पक्षांतर्गत विरोधानंतर बडोदा आणि साबरकांठा येथील उमेदवार बदलण्याची ही पहिलीच वेळ होती. भाजपाने विद्यमान खासदार रंजन भट्ट यांच्या जागी बडोदामधील हेमांग जोशी यांना उमेदवारी दिली, तर साबरकांठामध्ये भिखाजी ठाकोर यांच्या जागी शोभना बरैया यांना उमेदवारी देण्यात आली. “आम्ही भाजपामध्ये असा विरोध कधीच पाहिला नाही,” असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. पक्षाने आधीच उमेदवार जाहीर केल्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना वेळ मिळाला, असेही ते म्हणाले.

२०१४ आणि २०१९ च्या निकालाच्या पुनरावृत्तीचे आव्हान

भाजपाने २०१४ आणि २०१९ मध्ये सर्व २६ लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळवला होता. याच निकालाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. यंदा भाजपाने पाच लाख किंवा त्याहून अधिक मतांच्या फरकाने सर्व जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. परंतु, हे लक्ष्य मतदानाच्या आकडेवारीवर अवलंबून आहे. नवसारीमधून चौथ्यांदा निवडणूक लढविणारे राज्य भाजपाचे प्रमुख सी. आर. पाटील यांनी जास्तीत जास्त मतदान व्हावे म्हणून १ मे रोजी सक्रिय उपाययोजना करण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. ते २०१९ मध्ये ६.८९ लाख मतांनी विजयी झाले होते. २०१९ मध्ये इतक्या मोठ्या फरकाने निवडणूक जिंकणारे ते देशातील पहिले खासदार होते.

भाजपाचे विरमगाम येथील आमदार आणि पाटीदार कोटा आंदोलनातील नेते हार्दिक पटेल यांनी विश्वास दर्शवला की, भाजपा पुन्हा गुजरातमध्ये धुव्वा उडवेल. “२०१९ मध्ये आम्ही पाच लाखांहून अधिक आघाडीसह पाच जागा जिंकल्या आहेत,” असे पटेल यांनी सोमवारी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

गुजरातमध्ये काँग्रेस कमकुवत

राज्य विधानसभेतील सर्वात कमी संख्या असलेला काँग्रेस २३ संसदीय जागा लढवत आहे. भाजपाच्या विरोधात क्षत्रिय समाजाच्या नाराजीचा कुठे न कुठे काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रोहन गुप्ता यांनी अहमदाबाद पूर्वेतील लढतीतून अचानक माघार घेत भाजपामध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसलाही नाराजीचा सामना करावा लागला आहे.

काँग्रेसकडे सध्या १४ आमदार उरले असून त्यापैकी पाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. यात तुषार चौधरी (साबरकांठा), अमित चावडा (आनंद), अनंत पटेल (वलसाड), गेनीबेन ठाकोर (बनासकंठा) आणि गुलाबसिंह चौहान (पंचमहाल) यांचा समावेश आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाने (आप) त्यांचे दोन आमदार चैतर वसावा आणि उमेश मकवाना यांना भरूच आणि भावनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पाठवले आहे. भाजपा मोदींच्या प्रतिमेवर निवडणूक लढवत आहे, तर विरोधकांनी संविधानाच्या बचावाची भूमिका घेतली आहे. विरोधकांनी भाजपाच्या “अबकी बार, ४०० पार” घोषणेवर हल्ला चढवला असून संविधानात बदल करण्यासाठी भाजपाला बहुमत हवे आहे, असा दावा केला आहे.

हेही वाचा : राजकारणात येण्यासाठी भाजपाचीच निवड का केली? उज्ज्वल निकम यांनी सांगितले खरे कारण

दरम्यान, पोरबंदर, मानवदर, विजापूर, खंभात आणि वाघोडिया या पाच विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. वाघोडिया मतदारसंघात माजी अपक्ष आमदार धर्मेंद्रसिंह वाघेला भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत, तर इतर जागांवर भाजपात सामील झालेले काँग्रेसचे माजी आमदार अर्जुन मोढवाडिया, अरविंद लदानी, सी. जे. चावडा आणि चिराग पटेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

2024-05-07T08:06:26Z dg43tfdfdgfd